दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी एक नवीन नियम जारी
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी एक नवीन नियम जारी
राज्यभरात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक नवीन नियम जारी केला आहे. राज्यात बारावीचा पेपर WhatsApp वर व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर राज्य मंडळाने हा नियम बदलला आहे. हा नियम बुधवार १६ मार्च २०२२ च्या पेपरपासून अंमलात आणला आहे.
नवीन नियम काय आहे?
आतापर्यंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात उत्तरपत्रिका लेखन सुरू झाल्यानंतरही १० मिनिटे उशिरा आल्यास, अपवादात्मक परिस्थितीत, योग्य कारण असल्यास, प्रवेश दिला जात होता. मात्र यापुढे एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लेखन सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाऊ नये, अशी सक्त सूचना राज्य मंडळाने सर्व केंद्रप्रमुखांना दिली आहे.
राज्य मंडळाने यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी एक परिपत्रक जारी केले आहे. यात मंडळाने असे म्हटले आहे की उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत या वेळेनंतर १० मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. त्यासाठी केंद्रसंचालकांना त्या विद्यार्थ्याचे उशिराने येण्याचे कारण रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष किंवा विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरून पूर्वामान्यता घेऊन आणखी दहा मिनिटे (एकूण २० मिनिटे) विलंब क्षमापित करून विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशा राज्य मंडळाच्या सूचना होत्या.
मात्र, या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिणामी ही सवलत १६ मार्च २०२२ पासून बंद करण्यात येत आहे.
COMMENTS